1001marathiessay.blogspot.com
सर्व वाचक मित्रांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला एका सुंदर निसर्ग दृश्याचे वर्णन हा निबंध सांगणार आहे.या निबंधात मी प्रत्यक्ष अनुभवलेले निसर्ग दृश्य कसे होते याविषयी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील हा निबंध वाचल्यानंतर तुम्ही बघितलेला एखादा सुंदर निसर्ग देखावा तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा.
मी पाहिलेल्या निसर्ग दृश्याचे वर्णन
Mi pahilelya nisarg drushyache varnan.
आज पर्यंत अनेक चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून स्वतःच्या अजब निर्मिती क्षमतेच्या आधाराने छान-छान देखावे रंगवले. नक्कीच त्यांच्या कलेची मी कदर करतो. परंतु निसर्गासारखा सुंदर चित्रकार किंवा कलाकार दुसरा कोणीही होऊ शकत नाही. निसर्गात असलेल्या प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःचे असे सौंदर्य आणि विशेषत्व आहे.
निसर्गामध्ये खूप सारे सुंदर दृश्य वारंवार आपल्या निदर्शनास येतात. असाच एक सुंदर देखावा बघण्याचा योग मलादेखील आला. तो देखावा आजही माझ्या डोळ्यासमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो.
आत्ताच काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या घरापासून सुमारे 120 किलोमीटरवर असलेल्या सापुतारा या ठिकाणी गेलो होतो. हे ठिकाण उत्कृष्ट सनसेट पॉईंट या नावाने प्रसिद्ध आहे. सापुतारा याठिकाणी एका डोंगरावर हा सन सेट पॉईंट आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेला लागूनच हे ठिकाण आहे.
मी पाहिलेला सूर्यास्त
सकाळी लवकरच सर्व तयार होऊन आम्ही निघालो. जवळच असलेल्या देवी सप्तशृंगीच्या गडावर आम्ही गेलो. देवीचे दर्शन घेतले .तेथील निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पांढऱ्या शुभ्र धुक्याच्या चादरी खाली झोपलेला संपूर्ण डोंगर अगदी सुंदर दिसत होता. आजूबाजूचा संपूर्ण परिसर फिरून झाल्यानंतर आम्हाला जवळपास तीन चार वाजले होते.
त्यानंतर आम्ही सापुताऱ्याच्या दिशेने निघालो. काहीसा डोंगरांचा व काहीसा सपाटीचा रस्ता पार करून आम्ही सापुतारा या ठिकाणी आलो. पर्यटकांची बरीच गर्दी त्याठिकाणी जमलेली होती. सर्वजण सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी आसुसलेले होते .तिथे असलेल्या दुकानांवर बरीच गर्दी दिसत होती. गुजराती भाषिकांची त्या ठिकाणी जास्त रेलचेल दिसत होती.
ज्या ठिकाणाहून सूर्यास्त बघायचा होता ते ठिकाण डोंगरावरून ठिकाणी होते. तिथपर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनांना परवानगी नव्हती. तेथीलच संस्थेच्या दुचाकी वाहनांची त्याठिकाणी व्यवस्था केलेली होती. त्यांच्यावर बसूनच ठरलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचता येत होते.
त्या दुचाकी वर एक एक व्यक्ती जाण्यासाठी बरेच पैसे लागणार होते. येणाऱ्या खर्चाचा हिशोब करून बाबांनी सांगितले की ,आपण चालतच तिथपर्यंत जाऊया. आम्हालाही त्या वातावरणात डोंगर सोडून तिथपर्यंत चालून जाणे मजेशीर वाटले. इतर अनेक लोक ही चालत जाताना दिसत होते. आम्हीही या संधीचा फायदा घेत आनंदाने सनसेट पॉइंट पर्यंत जाण्याचे ठरवले. आणि निघालो गप्पा मारत.
अंतर कमी दिसत होते, परंतु चालताना मात्र उभा चढ असल्यामुळे सगळेच लवकर दमले. आजी-आजोबा तर पार मागेच राहिले होते. आम्ही मात्र वेगाने पुढे जात होतो . मी दादाचा हात धरून जणू घाईघाईने युद्धा वरच निघालो होतो. वरती केल्यानंतर दादाने एक मक्याचे कणीस विकत घेऊन दिले . त्यावर लावलेल्या चटणी आणि पिळलेल्या लिंबू मुळे कणीसाची चव इतकी सुंदर लागत होती की इतके मोठे कणीस मी एकट्यानेच फस्त केले.
मी बघितलेला सूर्यास्त मराठी निबंध
दम टाकत टाकत या ठिकाणापर्यंत शेवटी आम्ही पोहोचलो. समोर बघतो तर काय, आजपर्यंत कधीही बघितला नव्हता इतका प्रचंड मोठा गोळा आमच्या दृष्टीसमोर होता. सूर्य अगदी जवळ दिसत होता.
सूर्याचा प्रकाश मंद होता. संपूर्ण आकाशभर केसरी रंग आणि पिवळा रंग पसरलेला दिसत होता. प्रचंड तेजोमय सूर्य आम्ही हाताने स्पर्श करावा इतका जवळ आम्हाला वाटत होता. आत्ताच पळत जाऊन सूर्याच्या अंगाखांद्यावर खेळून यावे असे वाटत होते.
दिवसभर फिरून फिरून दमलेले पक्षी आपल्या घरट्याकडे परत निघाले होते. चोचीत आपल्या पिलांसाठी दाणे घेऊन निघालेले पक्षी स्वतःच्याच धुंदीत रांगेत उडत होते. कवायती साठी उभ्या असलेल्या सैनिकां सारखे सर्व पक्षी एका नक्षीमध्ये पुढे पुढे सरकत होते. मागे सूर्य आणि या पृष्ठभागावर पक्षांची सुंदर नक्षी उमटलेली होती.
हे नयनरम्य दृश्य अजन्म डोळ्यात साठवून घ्यावे. आग ओकणारा सूर्य इतका शांत आणि संयमी असू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सगळेजण घेत होतो. जशी प्रत्येकाच्या आयुष्याची संध्याकाळ ठरलेलीच आहे त्या पद्धतीने अस्ता च्या दिशेने जाताना प्रचंड तेजाने झळकत जणू सूर्य आम्हाला निरोप देत होता.
हळूहळू ते तेजोमय सूर्यबिंब खाली सरकू लागले. मनात वाटले काही क्षण हा त्यांचा काटा करावा आणि सूर्याला या क्षितिजावर तसेच लटकवून ठेवावे. पण काही गोष्टी फक्त कल्पनाच केलेल्या बऱ्या.
हळूहळू सूर्याचे बिंब डोंगराच्या आड दिसेनासे होऊ लागले. काही क्षणापुरवी जो डोंगर सूर्याच्या बिंबा पुढे अगदी छोटा दिसत होता. त्या छोट्याशा डोंगरामागे एवढा मोठा सूर्य दिसेनासा झाला होता. खरोखर निसर्गाची फार मोठी किमया आहे.
कोण कधी कुणाच्या छत्राखाली येईल आणि कोणाचे दिवस कसे बदलतील याचा काहीही नियम नाही म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळा प्रेमाने आणि संयमाने वागा हाच संदेश घेऊन सूर्यनारायण पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर अंधारावर विजय मिळवण्यासाठी निघून गेला.
या निबंधाचे खालीलप्रमाणे ही नावे असू शकतात.
1) माझ्या आठवणीतील सहल
2) मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
3) मी पाहिलेला सूर्यास्त
4) माझ्या स्मरणातील प्रेक्षणीय स्थळ
प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेल्या निसर्ग दृश्याचे वर्णन किंवा मी बघितलेला सूर्यास्ताचे वर्णन कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद....
हे वाचायला अजिबात विसरू नका
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.